१२व्या शतकातील स्त्रीसमानतेचा पाया : महात्मा बसवेश्वर यांच्या स्त्रीविषयक कार्याचे ऐतिहासिक विश्लेषण
Abstract
१२व्या शतकात भारतीय समाजव्यवस्था ही ब्राह्मणवादी वर्चस्व, जातीय विषमता आणि पितृसत्ताक मूल्यांनी संरचित झालेली होती. पितृसत्ताक सामाजिक रचनेत स्त्रियांचे स्थान दुय्यम आणि मर्यादित होते. अशावेळी महात्मा बसवेश्वरांनी उभारलेली वीरशैव-लिंगायत चळवळ ही केवळ धार्मिक सुधारणाच नव्हती, तर ती सामाजिक परिवर्तनाचीही चळवळ ठरली . प्रस्तुत शोधनिबंधात बसवेश्वरांच्या स्त्रीविषयक दृष्टिकोनाचे ऐतिहासिक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बसवेश्वरांनी ‘कायकवे कैलास’ या तत्त्वाद्वारे श्रमाला आध्यात्मिक मूल्य दिले आणि स्त्रीच्या श्रमाचेही समान महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून स्त्रियांना वैचारिक आणि आध्यात्मिक अभिव्यक्तीचे व्यासपीठ उपलब्ध करून सामाजिक जागृतीची चळवळ सुरू केली. अक्कमहादेवीं सारख्या स्त्री संतांच्या सहभागामुळे स्त्रीला धार्मिक क्षेत्रात स्वतंत्र अस्तित्व आणि सन्मान निर्माण होण्यास मदत झाली . बसवेश्वरांनी जातिव्यवस्था आणि लिंगभेद या दोन्ही संरचनांना वैचारिक पातळीवर आव्हान दिले. त्यांनी आपल्या वचनसंग्रहात समाजातील असमानता, पितृसत्ताक पद्धतीचे वर्चस्व आणि स्त्रियांवरील अन्याय यावर भाष्य केले. त्यांच्या दृष्टिकोनातून स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांची निर्णयक्षमता, स्त्रियांचे आर्थिक स्वावलंबन, आणि धार्मिक-सांस्कृतिक सहभाग यावर भर दिलेला होता. त्यांना पारंपारिक भारतीय समाजातील वर्ण, जातिमूलक उच्चनीचता व विषमता यांची प्रखर जाणीव झाली होती. म्हणूनच त्यांनी चातुर्वर्ण्याला आव्हान देऊन सर्व मानवांना समान मानले. परिणामतः त्यांच्याभोवती सर्व वर्णातील व जातींतील अनुयायी जमा झाले. त्यांनी आंतरजातीय रोटीव्यवहार व बेटीव्यवहार करण्यासदेखिल प्रोत्साहन दिले.