महात्मा बसवेश्वर उर्फ बसवण्णांचे क्रांतिकारी तत्वज्ञान
Abstract
महात्मा बसवेश्वर हे एक थोर संत आणि महान तत्त्वज्ञ होते. विशेष म्हणजे लोकशाहीवादी विचारांना अवसर करून देणारे आणि अंमलात आणणारे एक महान समाज सुधारक आणि क्रांतिकारी विचारवंत होते. कर्नाटकातील बागेवाडी(जि.विजापूर) या गावामध्ये त्यांचा जन्म झाला,तर धर्मकार्य- क्रांतिकार्य आटोपल्यावर कुडलसंगम येथे त्यांनी कृष्णा-मलप्रभेच्या साक्षीने कुडलसंगमदेवाशी लिंगैक्य साधले आणि शिव तत्वात विलीन झाले. सामान्यपणे साठ-बासष्ठ वर्षांचा अवनीतलावरील त्यांचा हा वावर बाराव्या शतकात येतो. त्यांचा हा कालखंड सुमारे इसवी सन ११०५ ते ११६७ असा येतो असे म्हटले जाते.त्यांचे तत्त्वज्ञान मानवतावादी,लोकहिताचे आणि समताधिष्ठित असे होते. त्यांनी देवालय आधारित धर्म, रुढी,जातिभेद, कर्मकांड, अंधश्रद्धा यांना नाकारुन शरण संप्रदाय किंवा लिंगायत धर्म घडवला.त्यांची शिकवण वचन साहित्यात आहे. हे वचन साहित्य हाच या धर्माचा धर्मग्रंथ आहे.