बसवेश्वरांच्या विचारांची समकालीन प्रस्तुतता : एक चिकित्सक अभ्यास
Abstract
भारताच्या सामाजिक व धार्मिक इतिहासात बाराव्या शतकातील महात्मा बसवेश्वर यांचे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी केवळ आध्यात्मिक मार्गदर्शन केले नाही, तर सामाजिक पुनर्रचनेचा धाडसी प्रयत्न केला. त्या काळातील संपूर्ण समाज व्यवस्थेचा त्यांनी धिक्कार केला आणि चातुर्वर्ण्याच्या किंवा श्रम विभागणीच्या तत्त्वाच्या बुरख्याआड चाललेल्या पिळवणुकीच्या आणि स्वार्थी संधी साधूपणाच्या विरोधात त्यांनी आघाडी उघडली. धर्माचे सत्य स्वरूप त्यांनी तर्कशुद्धपणे विशद केले. तत्कालीन काळात जातीव्यवस्था, अस्पृश्यता, स्त्रीदास्य, कर्मकांडप्रधान धर्म, आणि आर्थिक विषमता यांचा समाजावरील प्रभाव प्रभावी होता. अशा परिस्थितीत महात्मा बसवेश्वरांनी समता, श्रमसंस्कार मूल्ये मांडून एक सामाजिक क्रांती घडवून आणली. दक्षिणेतील प्रबुद्ध अशी ओळख असणाऱ्या महात्मा बसवेश्वरांनी सर्वप्रथम उच्चवर्णीय लोकांची मिरासदारी असणारी ईश्वरभक्ती आणि ईश्वरपूजा ही परंपरा मोडून काढली आणि सर्व जातीसहित स्त्रियांनाही भक्तीचे द्वार खुले केले.