सामाजिक सुधारणा आणि समतेचा विचार : महात्मा बसवेश्वरांच्या चिंतनाचा अभ्यास
सार
महात्मा बसवेश्वर (इ.स. १२वे शतक) हे भारतीय समाजचिंतनाच्या इतिहासातील एक अद्वितीय समाजसुधारक, तत्त्वज्ञ आणि आध्यात्मिक क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या विचारसरणीने केवळ धार्मिक परिवर्तन घडवले नाही, तर सामाजिक समता, श्रमाची प्रतिष्ठा, स्त्री-स्वातंत्र्य आणि आर्थिक न्याय या मूल्यांची पायाभरणी केली. प्रस्तुत संशोधन लेखात बसवेश्वरांच्या सामाजिक सुधारणा आणि समतेविषयक विचारांचा ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यात आलेला आहे. विविध मराठी, हिंदी व इंग्रजी ग्रंथ, संशोधन लेख, ई-पुस्तके, संपादकीय लेख याच्या आधारे त्यांच्या विचारांचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले आहे. अभ्यासातून असे स्पष्ट होते की बसवेश्वरांचे तत्त्वज्ञान हे मध्ययुगीन भारतातील सामाजिक लोकशाहीचे प्रारूप होते. त्यांच्या ‘कायक’ आणि ‘दसोह’ या तत्त्वांमध्ये सामाजिक न्याय, आर्थिक समानता आणि नैतिक जबाबदारी यांचा सुसंवाद दिसून येतो. आधुनिक भारतीय राज्यघटनेतील समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांशी त्यांच्या विचारांचे आशयात्मक साम्य आढळते.