नाशिक जिल्ह्यातील आदिवासी स्त्री जीवनाचा सामाजिक व आर्थिक समस्यांचा एक अभ्यास
Keywords:
आदिवासी स्त्रिया, सामाजिक-आर्थिक समस्या, शिक्षण, आरोग्य, रोजगार, दारिद्र्य, स्थलांतर, जंगलाधारित अर्थव्यवस्था, स्वयंसहायता गट, शासकीय कल्याणकारी योजनाAbstract
हा शोधनिबंध महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या आदिवासी स्त्रियांच्या सामाजिक व आर्थिक समस्यांचा अभ्यास करण्यावर केंद्रित आहे. नाशिक जिल्ह्यात भिल्ल, कोकणा, वारली, कातकरी, ठाकूर व महादेव कोळी या विविध आदिवासी जमाती मोठ्या संख्येने आढळतात. कुटुंबव्यवस्था, आर्थिक व्यवहार तसेच सामाजिक जीवनात आदिवासी स्त्रियांची भूमिका महत्त्वाची असली, तरीही त्यांना अनेक सामाजिक व आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. सामाजिक अंगाने पाहता, आदिवासी स्त्रिया शेतीकाम, जंगलावर आधारित उपजीविका, घरगुती जबाबदाऱ्या तसेच सांस्कृतिक व धार्मिक विधींमध्ये सक्रिय सहभाग घेताना दिसतात. मात्र अशिक्षण, बालविवाह, अल्पवयीन मातृत्व, अपुरी आरोग्य व पोषणस्थिती, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, हक्क व कल्याणकारी योजनांविषयी असलेली अल्पजाणीव तसेच लिंगभेद यांसारख्या समस्यांमुळे त्यांच्या सामाजिक दर्जावर प्रतिकूल परिणाम होतो. आदिवासी समाजात स्त्रियांना तुलनेने काही प्रमाणात स्वातंत्र्य असले, तरी कौटुंबिक व सामाजिक निर्णयप्रकिया आर्थिकदृष्ट्या आदिवासी स्त्रिया शेती, मजुरी, जंगलउपज संकलन, पशुपालन तसेच असंघटित क्षेत्रातील रोजगाराच्या माध्यमातून कुटुंबाच्या उत्पन्नात मोलाचा वाटा उचलतात. तथापि, कमी मजुरी, रोजगाराची अनिश्चितता, हंगामी स्थलांतर, जमिनीच्या मालकीचा अभाव, दारिद्र्य आणि शासकीय योजनांचा अपुरा लाभ या अडचणी त्यांच्या आर्थिक स्वावलंबनावर मर्यादा आणतात. या अभ्यासातून शिक्षणाचा प्रसार, आरोग्यसेवांचा विस्तार, रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास, स्वयंसहायता गटांचे बळकटीकरण तसेच शासकीय कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी लक्ष केंद्रीत प्रयत्नांची आवश्यकता स्पष्ट होते. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी स्त्रियांचे सामाजिक व आर्थिक सबलीकरण हे त्यांच्या जीवनमानाच्या उन्नतीसाठीच नव्हे, तर संपूर्ण आदिवासी समाजाच्या शाश्वत विकासासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे.